सावधान — थुंकणे आणि उघडय़ावर शौचासाठी भरावा लागणार दंड

देशभरात राबविण्यात येणाऱया ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या पार्श्वभूमीवर राज्यभरातही कडक धोरण तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार अ, ब, क आणि ड वर्ग महापालिका तसेच नगरपालिकांमध्ये कचरा टाकणारे, थुंकणाऱयांवर, उघडय़ावर शौच करणाऱयांकडून दंड वसूल केला जाणार आहे. मुंबई महापालिकेत असलेला दंडाचा नियम आता सर्व महापालिकांना लागू होणार आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने केलेल्या नियमावलीनुसार रस्त्यावर कचरा टाकल्यास १८० रुपये दंड आकारला जाणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रुपये मोजावे लागणार आहेत.
उघडय़ावर शौच करणाऱयांकडून ५०० रुपये कसूल केले जाणार आहेत. याविषयीचे निर्देश महापालिका, नगरपालिकांना देण्यात आले आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील कलम १५ नुसार महापालिका, नगरपालिकांनी उपविधी तयार करून स्वच्छतेबाबतच्या तरतुदींचे पालन न करणाऱया व्यक्ती वा संस्थांना दंड करणे आवश्यक आहे. हा नियम अमलात येऊन दोन वर्षे उलटली तरी बहुतांश महापालिका, नगरपालिकांनी नियम तयार न केल्याने आता दंड आकारणीचे आदेश थेट नगरविकास विभागानेच काढले आहेत.
आदेशाची तात्काळ अंमलबजावणी –
वरील प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांकडून जागेवरच दंड वसूल करण्याचे अधिकार सर्व संबंधित महापालिकांना देण्यात येत असून, संबंधित महापालिकेचे आयुक्त हे आवश्यकतेनुसार सदर अधिकार महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी अथवा त्रयस्थ संस्थांना प्रदान करू शकतील. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.
केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. शहरांमधील ज्या कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा नाही अशा कुटुंबांना शौचालयाची वैयक्तिक अथवा सामुदायिक सुविधा उपलब्ध करून देऊन शहरे हागणदारीमुक्त करणे आणि शहरातील घनकचरा व्यवस्थापन करून शहरे स्वच्छ करणे या दोन टप्यात हे अभियान राबविण्यात येते. संपूर्ण नागरी भाग हा १ ऑक्टोबरला हागणदारी मुक्त झाल्याचे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले होते. तथापि, बहुतांश महापालिकांनी घनकचरा व्यवस्थापन कायद्यातंर्गत घाण व अस्वच्छता करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना दंड करण्याचे उपविधी दोन वर्षांनंतरही तयार केले नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यासाठी या कायद्याच्या तात्काळ अंमलबजावणीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
बदल आपल्यापासून पण करायला हवा –
एकीकडे आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. मंगळावर आपले यान पोहोचले आहे. मात्र आपली शहरे, आपले गाव आपण अस्वच्छ करत आहोत. यात बदल केला पाहिजे. आणि म्हणूनच शासनाने हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.
याची सुरुवात आपण आपल्या पासून केली पाहिजे. आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो, तसे सार्वजनिक ठिकाणी, बसमध्ये, लोकल मध्ये, ऑफिसेस मध्ये, उद्यानांमध्ये, इमारतींच्या आवारात स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच आपल्या मित्रांना, ऑफिसमधील सहकाऱ्यांना, आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्व सांगितले पाहिजे. साफसफाई करणे हे फक्त सफाई कर्मचाऱ्यांचे काम नसून, आपले पण कर्तव्य आहे.

