कोकणातले गजाली आता छोट्या पडद्यावर — गाव गाता गजाली
‘रात्रीस खेळ चाले’ नंतर लवकरच पुन्हा एकदा घराघरांत मालवणी फिव्हर दिसणार आहे. आणि याला कारण आहे झी मराठीवर लवकरच येणारी नवी मालिका ‘गाव गाता गजाली‘. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमध्ये पांडूची गाजलेली भूमिका साकारणारे प्रल्हाद कुडतरकर यांनी या नव्या मालिकेचे लेखन केले आहे. निर्माते संतोष काणेकर यांनी या मालिकेची निर्मिती असून दिग्दर्शकाची जबाबदारी राजू सावंत यांनी साकारली आहे.

‘शांत राहणं’ हा कोकणी माणसाचा धर्म आहे. आणि याच स्वभावानुसार कोकणात जागोजागी गप्पांचा फड रंगलेला दिसत असतो. या गप्पांनाच मालवणी भाषेत गजाली’ असं म्हटलं जातं. परबांच्या चेडवापासून ते ट्रम्पच्या बायलेपर्यंतच्या गप्पा कोकणात रंगतात. आता याच गप्पा ‘गाव गाता गजाली’च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर रंगणार आहेत. ही मालिका येत्या 2 ऑगस्टपासून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वा. झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.


‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमुळे सिंधुदुर्गातील आकेरी गाव प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. तर ‘गाव गाता गजाली’मध्ये मिठबाव हे गाव कथानकातील मुख्य स्थळ आहे. त्यामुळे कोकणी माणसांच्या गजालीसोबतच कोकणाचं निसर्गसौदर्य प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेमध्येही बऱ्याच स्थानिक लोकांना अभिनयाची संधी मिळाली आहे.
